महावीर (वर्धमान)

पिता: सिद्धार्थ · माता: त्रिशला (प्रियकारिणी)
कुळ: नाथ/ज्ञातृ वंश · आयुष्य: ७२ वर्ष
प्रकार: तीर्थंकर
भगवान महावीर, मूळ नाव वर्धमान, हे चोवीसावे व वर्तमान अवसर्पिणी कालचक्रातील अंतिम तीर्थंकर आहेत.  वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी राजवैभवाचा त्याग करून दीक्षा घेतली आणि सुमारे साडेबारा वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर ऋजुकूला नदीच्या तीरावर त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. त्यांचे ११ गणधर होते, त्यांपैकी इंद्रभूति गौतम हे प्रमुख गणधर होते. वयाच्या ७२ व्या वर्षी पावापुरी येथे त्यांना मोक्ष प्राप्त झाला; हा दिवस दिवाळी (कार्तिक अमावस्या) म्हणून साजरा केला जातो.

भगवान महावीरांनी दिलेली महत्वाची शिकवण:
  • "जिओ और जिने दो" (जगा आणि जगू द्या): केवळ स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करू नका, तर सूक्ष्म जंतूपासून ते प्राण्यांपर्यंत सर्वांना जगण्याचा अधिकार आहे.
  • अहिंसा परमो धर्मः: हिंसेचा पूर्ण त्याग.
  • आत्मनिर्भरता: "तुमचा आत्माच तुमचा सर्वात मोठा मित्र आणि शत्रू आहे." कर्माचे फळ स्वतःलाच भोगावे लागते, कोणीही देव तुमचे नशीब बदलू शकत नाही. स्वतःचे देव स्वतः बना (अप्पा सो परमप्पा).
  • अनेकांतवाद आणि स्यादवाद: त्यांनी सांगितले की प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन असू शकतात, त्यामुळे कोणाचाही द्वेष न करता सर्वांचे मत समजून घेतले पाहिजे.

भगवान महावीर: संक्षिप्त जीवन परिचय
चैत्र शुक्ल त्रयोदशीला कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ आणि माता त्रिशला यांच्या पोटी जन्म झाला. जन्मानंतर सौधर्म इंद्राने त्यांना सुमेरू पर्वतावर नेऊन क्षीरसागराच्या जलाने जन्माभिषेक केला. त्यांच्या अतुलनीय धैर्यामुळे इंद्राने त्यांना 'महावीर' आणि 'सन्मती' नाव दिले. भगवान महावीर वर्धमान, वीर आणि अतिवीर या नावांनीही ओळखले जातात.
भगवान महावीरांच्या शरीराचा रंग (वर्ण) तप्त कांचन वर्ण म्हणजेच तपकिरी-सुवर्ण होता. त्यांची उंची: ७ हात (अंदाजे १०.५ फूट) होती.

माता त्रिशला देवींचे १६ शुभ स्वप्न
जेव्हा तीर्थंकरांचा जीव मातेच्या गर्भात येतो (गर्भ कल्याणक), तेव्हा मातेला रात्रीच्या शेवटच्या प्रहरात १६ अत्यंत शुभ स्वप्ने पडतात, जी त्यांच्या चक्रवर्ती किंवा तीर्थंकर पुत्र होण्याचे संकेत देतात. भगवान महावीरांच्या माता त्रिशला यांना गर्भ कल्याणकाच्या वेळी १६ शुभ स्वप्ने पडली होती.  
१. ऐरावत हत्ती (सामर्थ्य आणि मोठेपणाचे प्रतीक)
२. पांढरा बैल (धर्माचा विस्तार करण्याचे प्रतीक)
३. सिंह (क्रूरतेवर विजय आणि शौर्याचे प्रतीक)
४. लक्ष्मी देवी (वैभवाचे प्रतीक)
५. दोन फुलांच्या माळा (सुगंधी यशाचे प्रतीक)
६. पूर्ण चंद्र (जगाला शांतता देण्याचे प्रतीक)
७. उगवता सूर्य (अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे प्रतीक)
८. दोन मासे (आनंद आणि समृद्धीचे प्रतीक)
९. दोन सुवर्ण कलश (अमृत आणि मांगल्याचे प्रतीक)
१०. कमळाचे सरोवर (पवित्रता आणि निर्मळतेचे प्रतीक)
११. उचळणारा समुद्र (गंभीरता आणि अथांग ज्ञानाचे प्रतीक)
१२. सुवर्ण सिंहासन (साम्राज्य आणि आदरणीय पदाचे प्रतीक)
१३. देवविमान (स्वर्गीय गुणांचे प्रतीक)
१४. नागेंद्राचे भवन / धरणेंद्र निवास (सुरक्षितता आणि उच्च कुळाचे प्रतीक)
१५. रत्नांची रास (गुणांच्या संपत्तीचे प्रतीक)
१६. निर्धूम अग्नी (धूर नसलेला अग्नी) (सर्व कर्मांचे दहन करून मोक्ष मिळवण्याचे प्रतीक)

बालपण आणि अखंड ब्रह्मचर्य 
भगवान महावीर हे बालपणापासूनच अत्यंत विरक्त आणि चिंतनशील होते. त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला नाही. ते आयुष्यभर पूर्णपणे अविवाहित (बालब्रह्मचारी) राहिले. 

वैराग्य व मुनी दीक्षा 
भगवान महावीरांना बाह्य जगातील कोणत्याही एका विशिष्ट दुःखद घटनेमुळे वैराग्य आले नाही (जसे इतरांना म्हातारपण किंवा मृत्यू पाहून येते). ते 'जातिस्मरण' (मागील जन्मांचे स्मरण) मुळे स्वतःहून विरक्त झाले. वयाच्या ३० व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये संसार, शरीर आणि भोगांबद्दल तीव्र विरक्ती निर्माण झाली आणि त्यांनी ठरवले की आता आत्म कल्याणाची वेळ आली आहे. त्यांनी लोकान्तिक देवांच्या प्रार्थनेनंतर दीक्षा घेतली.  दीक्षा घेतानाच त्यांनी सर्व वस्त्र आणि बाह्य परिग्रहाचा त्याग केला.

कठोर तपश्चर्या आणि केवलज्ञान 
त्यांनी सुमारे १२ वर्षे, ५ महिने आणि १५ दिवस अत्यंत कठोर मौन आणि निराहार तपश्चर्या केली.  वैशाख शुक्ल दशमीच्या दिवशी, जुंभिका गावाजवळ, ऋजुकुला नदीच्या काठावर एका साल वृक्षाखाली ध्यानस्थ असताना त्यांना 'केवलज्ञान' प्राप्त झाले. 

केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतरचा विहार
केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान महावीरांनी ३० वर्षे आर्यावर्तात (उत्तर आणि मध्य भारतात) पायी विहार केला. त्यांनी मगध, अंग, मिथिला, काशी, कौशाम्बी, राजगृह, आणि वैशाली या राज्यांमध्ये सतत भ्रमण करून धर्मोपदेश दिला.
जैन मुनी कधीही एका जागी स्थिर राहत नाहीत (केवळ पावसाळ्यातील ४ महिने 'चातुर्मास' सोडून), या नियमानुसार भगवंतांचा विहार अविरत सुरू होता, ज्याचा अंत पावापुरी येथे त्यांच्या निर्वाणाने झाला.

समवशरण आणि दिव्यध्वनी
केवलज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान महावीरांसाठी देवांनी 'समवशरण' ची रचना केली.  भगवान महावीरांचे मुख न हलता, त्यांच्या शरीरातून एक विशेष प्रकारचा अक्षरात्मक नसलेला (ध्वन्यात्मक) नाद निघत असे, त्याला 'दिव्यध्वनी' म्हणतात. हा ध्वनी दिवसातून ४ वेळा (किंवा आवश्यकतेनुसार) सुटायचा. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समवशरणात बसलेले मनुष्य, देव, आणि प्राणी (सिंह-गायीसारखे परस्परांचे वैरीही) आपापल्या भाषेत या उपदेशाचा अर्थ समजून घेत असत. हा ध्वनी ऐकण्यासाठी गणधरांची उपस्थिती अनिवार्य असते.

अतिशय आणि प्रातिहार्य 
तीर्थंकरांचे महात्म्य दर्शवणाऱ्या काही अतिसामान्य शक्ती आणि चमत्कारांना 'अतिशय' म्हणतात. एकूण ४६ गुण तीर्थंकरांच्या ठिकाणी असतात.
  • जन्म, केवलज्ञान आणि देवकृत अतिशय
    जन्म अतिशय (१०): जन्मापासूनच शरीराला घाम न येणे, शरीर सुगंधी असणे, मलमूत्र नसणे, प्रिय वचन बोलणे, अतुल्य बल असणे, रक्ताचा रंग पांढरा (दुधासारखा) असणे इत्यादी.
    केवलज्ञान अतिशय (१०): भगवंतांच्या चारही बाजूंना शंभर योजनांपर्यंत सुबत्ता असणे, आकाशात गमन करणे, मुखाने न बोलता उपदेश होणे, शरीराची सावली न पडणे, डोळ्यांची पापणी न लवणे इत्यादी.
    देवकृत अतिशय (१४): देवांद्वारे केली जाणारी रचना; जसे की संपूर्ण भूमी आरशासारखी स्वच्छ होणे, ऋतू नसतानाही फुलांचा पाऊस पडणे, काट्यांचे तोंड जमिनीकडे खाली होणे, अनुकूल वारा वाहणे इत्यादी.
  • ८ प्रातिहार्य 
केवलज्ञान झाल्यानंतर समवशरणात देवांद्वारे भगवंतांच्या सेवेत ८ वैभवशाली गोष्टी उपस्थित केल्या जातात:
१. अशोक वृक्ष: भगवंतांच्या मागे असणारा विशाल आणि पवित्र वृक्ष.
२. सिंहासन: देवांनी रचलेले स्फटिकाचे भव्य सिंहासन, ज्याच्यापासून ४ बोटे वर भगवान अंतरिक्ष विराजमान असतात.
३. भामंडल: भगवंतांच्या पाठीमागे असणारे वलय, ज्यामध्ये भक्तांना आपले मागील तीन आणि पुढील तीन भव दिसतात.
४. चामर: भगवंतांच्या दोन्ही बाजूला देव ६४ चामर ढाळतात.
५. छत्रत्रय: भगवंतांच्या डोक्यावर तीन छत्र असतात, जे तिन्ही लोकांचे स्वामी असल्याचे दर्शवतात.
6. दिव्यध्वनी
७. पुष्पवृष्टी: आकाशातून सुगंधित फुलांचा वर्षाव होतो.
८. दुंदुभी: स्वर्गीय वाद्यांचा आणि नगाऱ्यांचा मंगलमयी नाद होतो.

भगवान महावीरांचा पूर्वभव: 
भगवान महावीरांनी २४ व्या तीर्थंकर पदापर्यंत पोहोचण्यापूर्वी २७ भवांची दीर्घ आत्मिक यात्रा पूर्ण केली. त्यांच्या या पूर्वजन्मांची सुरुवात पुरूरवा या एका दयाळू भीलाच्या रूपाने झाली. पुरूरवाच्या जीवनात त्यांनी साधूंची सेवा केली, ज्यामुळे त्यांना सम्यक दर्शन प्राप्त झाले. त्यांच्या पूर्वभवांपैकी अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'मरीची' यांचा भव. ते पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेवांचे नातू (भरत चक्रवर्ती यांचे पुत्र) होते. या भवातूनच त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची निर्जरेची  सुरुवात झाली. त्यानंतर अनेक जन्म, देवलोक आणि नरक यातून प्रवास करत (ज्यात ते 'त्रिपृष्ट वासुदेव' आणि जंगलातील एक 'सिंह' देखील होते) त्यांच्या तीव्र तपश्चर्येने कर्मक्षय झाला. शेवटच्या जन्माच्या आधीच्या भवात ते 'नंदन राजा' होते. या जन्मात त्यांनी 'तीर्थंकर' प्रकृतीचा बंध केला.

चिन्ह: सिंह

पंच कल्याणक

कल्याणकस्थानतिथी
गर्भ कल्याणककुंडलपूरआषाढ शुक्ल षष्ठी
जन्म कल्याणककुंडलपूरचैत्र शुक्ल त्रयोदशी
दीक्षा (तप) कल्याणककुंडलपूरमार्गशीर्ष कृष्ण दशमी
केवलज्ञान कल्याणकऋजुकूला नदी तट (जृंभीग्रामवैशाख शुक्ल दशमी
मोक्ष कल्याणकपावापुरीकार्तिक कृष्ण अमावस्या
निर्वाण आसन: Padmasana
गणधर संख्या: 11 · मुख्य गणधर: इंद्रभूति गौतम
इंद्रभूति गौतमअग्निभूतिवायुभूतिव्यक्तसुधर्ममंडितमौर्यपुत्रअकंपितअचलभ्रातामेतार्यप्रभास
पुढे: ऋषभनाथ (आदिनाथ)
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान